
कसे आहे उपकरण?
मोरे म्हणाले, की या वॉटर कंडिशनरमध्ये कॅटॅलिक आणि मॅग्नेटिक परिणाम तयार होतात. विहिरीच्या काठावर हे वॉटर कंडिशनर उपकरण लावायचे असते. त्यात व्हेंच्युरी असते. ज्या शेतकऱ्यांना याचा वापर करायचा आहे ते शेतकरी पाण्याचा नमुना तपासून म्हणजे त्याचा पृथक्करण अहवाल आणून आमच्याकडे देऊ शकतात. त्यावरून त्याच्या गरजेनुसार वॉटर कंडिशनरमध्ये सुधारणा करता येते. यात शेतकऱ्याचा पंप प्रति मिनिट किती लिटर पाणी डिसचार्ज करतो, मोटर किती एचपीची आहे ते पाहावे लागते. उपकरण यंत्रणेत एक कॅटॅलिस्ट चेंबरही असतो. तो जमिनीखाली साडेतीन फूट खाली बसवला जातो. वॉटर कंडिशनरमधून पाणी पुढे गेल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होतात. पाण्याचा पृष्ठीय ताण (सरफेस टेन्शन) कमी होतो. पाणी अधिक प्रमाणात जमिनीमध्ये झिरपते. कॅटॅलॅक्टिक इफेक्टमुळे पाण्याला वेटर इफेक्ट (अधिक ओलावा धरणारे पाणी) प्राप्त होतो.
माती अधिक सच्छिद्र होते. भुसभुशीत होते व वाफसा अधिक काळ टिकून राहतो. अधिकाधिक पाण्याची बचत होते. आमच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या उपकरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे आणेवारी 50 टक्के पेक्षा कमी असूनही आमचे गाव हिरवेगार झाले आहे.

1) पाण्याची गुणवत्ता सुधारते
2) पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.
3) जमिनीत लाभदायक पोकळ्या तयार होऊन ओलावा टिकून राहतो.
4) केषाकर्षणामुळे (कॅपिलरी ऍक्शन) वनस्पती पाणी शोषून घेतात व तगून राहू शकतात.
फळबाग लागवडीचा फायदा म्हणजे कमी पाण्यातही काही पिके अधिक प्रमाणात तग धरून राहू शकतात. आवळ्याचे झाड तर सर्वाधिक पाण्याचा ताण सहन करू शकते. त्यामुळे बागेतील आवळ्याला सध्या तुलनेने पाणी दिले जात नाही. आता मोसंबीच्या झाडावर फळे लगडली आहेत. त्यामुळे या पिकाला प्राधान्याने पाणी दिले जाते.
बागेतील पेरू आणि आंब्याच्या झाडांमध्ये मल्चिंग केले आहे. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत अधिक काळ ओलावा टिकून राहतो. अशा प्रकारे झाडाच्या आवश्यकतेनुसार पाण्याचे उत्तम नियोजन करता येते.
मी शेतीत मशागत करत नाही. रासायनिक खतेही देत नाही. त्यामुळे जमिनीत गांडुळे आणि लाभदायक जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे जमीन पोकळ होते आणि अधिक काळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. संपूर्ण फळबाग क्षेत्राचे गट पाडून आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करतो. झाडांना पाणी देण्यापूर्वी झाडाची पाने आणि जमिनीतील ओलावा यांचे निरीक्षण करून गरज लक्षात घेऊनच पाणी दिले जाते. नव्या तंत्राचा वापर करूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करता येते. पावसाचे पाणी साठवून ठेवून त्याचा पुनर्वापर करणे उपयुक्त ठरते. अर्थात वॉटर कंडिशनरचा वापर केला, पाण्याची गुणवत्ता सुधारली, शेत हिरवेगार झाले हे लगेच काही होणारे नाही. त्याला किमान एक-दोन वर्षे अवधी द्यावा लागतो. मात्र शेतकऱ्यांनी आज नियोजन सुरू केले तर पुढे त्यांना त्याची चांगली फळे नक्कीच मिळतील.
पंढरीनाथ मोरे
सांगवी भुसार, ता. कोपरगाव, जि. नगर
संपर्क - 9881269253